शनिवार, १९ एप्रिल, २०२५

१४२७ सदाशिव पेठ

DISCLAIMER
या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटलेल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

प्रस्तावना -
या कथेतील "सिद्धार्थ" ही केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण जगातील त्या प्रत्येकाचा तो एक चेहरा आहे जो लाखोंच्या गर्दीत राहून सुद्धा स्वतः मात्र एकटा आहे.

शनिवार, २२ मार्च, २०२५

💞 एका प्रेमाची गोष्ट 💕

DISCLAIMER 
या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

प्रस्तावना -
या कथेतील "सारंग " ही केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण जगातील त्या प्रत्येकाचा तो एक चेहरा आहे ज्याने कधी ना कधी कोणावर तरी प्रेम केलं असेल,आणि प्रत्येक सारंगची कोणीतरी मधुरा असेल. 
(या कथेमध्ये काही ठिकाणी विनोदी स्पर्श देण्याचा प्रयत्न केला गेला असून त्यामागची विनोदबुद्धि आपणास समजली नाही तर त्यासाठी लेखक जबाबदार राहणार नाही.)
संध्याकाळी ६ वाजता जसं घड्याळातील २ काटे काही क्षणांसाठी का असेना दोनाचे एक होऊन जातात, तसंच एक होऊन जायचं होतं त्या दोघांना.

सांगलीच्या विश्रामबाग कॉलनीत राहणारी मधुरा दिसायला तशीच होती जशी एखादी जुनियर कॉलेजमध्ये १२वीत शिकणारी एक तरुणी. थोडी सरळ, थोडी हुशार, थोडी शांत आणि थोडी खट्याळ. खरं तर मुली स्वतःमध्येच थोडे थोडे का होईना पण सर्व गूण बाळगून असतात. आणि मुलांना तोच थोडकेपणा योग्य वेळी दिसून येत नाही, आणि कधी दिसला तर समजू शकत नाहीत.

विश्रामबाग कॉलनीपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या पटवर्धन पॅलेसच्या आवारात राहणारा सारंग मधुरासोबत १२वीच्या Chemistry क्लासमध्ये शिकतो. तो सुद्धा तसाच दिसायचा जसा की एखाद्या जुनियर कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुण. अंगापिंडाने अगदी भक्कम नसला तरीही डोक्यावर असणारया अस्ताव्यस्त केसांमुळे त्याचा बारीक सडपातळपणा सहज कोणाच्या नजरेत येत नव्हता. तो केसांना नेहमी ओलाचिंबं ठेवायचा कधी तेलाने तर कधी पाण्याने.

असं तर सारंग मित्रांमध्ये बोलताना आणि त्यांच्यात वावरताना एकदम बिनधास्त असायचा, पण मुली समोर येताच एकदम रिव्हर्स गियर पडल्याप्रमाणे शांत - संयमी, धीर - गंभीर होऊन जायचा. मधुरासमोर येताच अभ्यासात तितका उजवा नसलेला सारंग अगदी हुशार scholar वगैरे वगैरे होऊन जायचा.

त्याची संध्याकाळ ही संद्याकाळ प्रमाणेच असायची, उन्हाळ्यात सूर्य संध्याकाळी ७ नंतर क्लास सुटल्यावर मावळायचा तर थंडीमध्ये तोच सूर्य संध्याकाळी ७ च्या आधीच रजा घेऊन निघून जायचा.

रोज संध्याकाळी क्लासला जाण्यापूर्वी सारंग त्याचा मित्र सुरजच्या घराजवळून जायचा. सुरजचे घर दुसऱ्या मजल्यावर होते, आणि सारंग खालूनच ओरडायचा.

"सुरज, ए सुरज... सुरज्या.. ए सुरज्या.."

सारंगचा आवाज ऐकताच सुरजचे बाबा गॅलरीत येऊन सारंगला शांत करत.

"अरे हो, येतोय तो थांब जरा.." ...आणि बाबांना बघून सारंग दात काढून हसायचा.

तेवढ्यात सुरज सायकल घेऊन बाहेर यायचा... "बाबा घरी असताना ओरडतो कशाला रे?"

"तुझे बाबा बाल्कनीत येतात तेंव्हा त्यांच्या टकल्यावर ऊन पडतं तेंव्हा चकाकणारं टक्कल बघायला मला खूप मज्या येते.." ...सारंग खट्याळपणे म्हणायचा.

क्लासची वेळ ठरलेली असायची, संध्याकाळी ५ ते ७. क्लासचे देशपांडे सर तसे तर खूप चांगले होते, पण महिन्याच्या पहिल्या तारखेला सगळ्यांची फी नाही जमा झाली तर त्या दिवसापासून त्यांचा मूड तोपर्यंत बिघडायचा जोपर्यंत क्लासमधील प्रत्येकाची फी जमा होत नाही.

देशपांडे सर हे पुण्यातील एका मोठ्या कॉलेजमधून प्रोफेसर म्हणून निवृत्त झाले असल्यामुळे त्यांचा रसायनशास्त्र विषयातील अभ्यास खूप दांडगा होता. सोबतच त्यांना मुला - मुलींमधील chemistry चं सुद्धा चांगलंच ज्ञान होतं, त्यामुळे त्यांनी क्लासमध्ये मुला - मुलींची बॅच वेगवेगळी ठेवली नव्हती. त्यामुळेच की काय, क्लासचा वर्ग नेहमीच भरलेला असायचा. काही मुलं chemistry शिकायला यायची, तर काही स्वतःची chemistry जुळवायला.

सुरुवाती - सुरवातीला सारंग आणि सुरजचे क्लासमध्ये हजर राहण्याचे कारण म्हणजे क्लास मधल्या मुली होत्या, त्यानंतर सारंगचं क्लासमध्ये जायचं एकच कारण राहिलं होतं, ते म्हणजे मधुरा... याउलट मधुराचं क्लासमध्ये जायचं एकच कारण होतं, ते म्हणजे अभ्यास... ती आपल्या गुलाबी रंगाच्या सायकलवर पाठीवर पुस्तकांचं ओझं घेऊन यायची आणि कोणाशी नजरेला नजर न मिळवताच क्लास सुटला की निघून जायची.

खरंतर छोट्या शहरांमधलं जग हे अगदी लहान असतं. अशा ठिकाणी प्रेम व्यक्त करायला आणि नजरेला नजर मिळवायला सुद्धा खूप काही दिव्यं करावी लागतात.

क्लासमध्ये टोटल ७ मुली यायच्या. क्लासच्या सुरुवातीला सारंग आणि सुरज दोघांनाही सर्व सातही मुली आवडायच्या. पण काही काळाने सारंगला फक्त मधुरा आवडू लागली होती. पण सूरज मात्र बाकीच्या साही मुलींमध्ये गोंधळून गेला होता.

देशपांडे सर नेहमी क्लासमध्ये आदल्या दिवशीच्या शिकवणीवर प्रश्न विचारायचे, तेंव्हा मधुरा आणि इतर सर्व मुली नेहमी सगळी उत्तरं द्यायची. दुसरीकडे सारंग आणि सुरजसोबत वर्गातील इतर मुलं खाली मान घालून... "सॉरी सर, उद्या नक्की वाचून येऊ.." ...अशी रोजची ठरलेली उत्तरं द्यायची.

"अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय ना मी, वाचून या जरा ...नाहीतर बोर्डाच्या परीक्षेत माझा जप करत बसाल.." ...मुलांची उत्तरं ऐकून सर चिडून म्हणायचे. पण या गोष्टीचा कोणताच परिणाम कोणा मुलावर कधी झाल्याचं सरांना तरी कधी दिसलं नाही. रोजचा दिवस त्यांच्यासाठी एक सारखाच असायचा.

मधुरा आणि इतर सगळ्या मुली रोज क्लास सुरु होण्याआधी १५-२० मिनिटं लवकर यायच्या, आणि बाहेर ओठ्यावर बसून आदल्या दिवशीची उजळणी करायच्या. असच एके दिवशी चुकून का होईना पण सारंग आणि सुरज क्लास सुरु व्हायच्या थोडा वेळ आधी आले. मधुराकडे बघताच सारंग म्हणाला... "एक बोलायचं होतं बऱ्याच दिवसापासून.."

"हा, बोल की ..." ...सुरज सायकलचा स्टॅन्ड लावत म्हणाला.

"पण तू कोणाला बोलणार नाहीस ना.." ...सारंग सुरजकडे बघत म्हणाला.

"एवढा विश्वास नसेल तर नको सांगू ना मग.." ...सुरज आपल्या हाताच्या चार बोटांनी केस सारखे करत म्हणाला.

दोन जिवलग मित्रांमध्ये विश्वासावर प्रश्न उमटत असेल तर ती मैत्री कसली..??

"मला मधुरा खूप आवडते.." ...सारंग फार विचार न करता थोडा लाजतच म्हणाला.

"हो का..?? मला पण आवडते.. खरं तर मला सगळ्याच मुली आवडतात.." ...सुरज अगदी खळखळून हसला.

"गप्प रे.. मला ती तशी आवडते..." ...सारंग सुरजच्या हसण्यावर थोडा चिडला.

"तशी आवडते म्हणजे.." ...सुरजने विचारलं.

"अरे तशी म्हणजे.. प्रेम.. खरं प्रेम वगैरे असतं ना... तशी आवडते मला ती.." ...सारंगने जसं जमेल तसं फोडून सांगितलं.

हे ऐकताच सुरज पुन्हा खळाळून हसला, आणि म्हणाला.. "आणि ती कॉलेजमधली नेहा पण तुला आवडायची की..."

"हो आवडायची... पण ती मला शोभणारी नव्हती.." ...सारंगने स्वतःची बाजू मांडत खुलासा केला.

"का...? कारण जेंव्हा तू तिच्याकडे नोट्स मागायला गेलास तेंव्हा तिने आपल्या भावाकडे तुझी तक्रार केली होती... आणि तिचा भाऊ येऊन तुला चांगल्याच नोट्स देऊन गेला होता ...हणूनच ना..?" ... सुरज सारंगला आठवण करून देत बोलला. "हे बघ सारंग, जेंव्हा प्रेम करायचं असेल ना तेंव्हा मार खायची पण मानसिक तयारी ठेवावी लागते.. समजलं..?? ...मुलीच्या भावापासून ते मुलीचा एखादा मित्र, किंवा मुलीच्या आसपास राहणारा कोणीही ज्याला मुलगी तर भाऊच मानते पण तो तिला काय मानतो हे माहिती नसतं, असा कोणीही येऊन हाणून जाऊ शकतो.. प्रेम तर करायचं आणि मार पण नाही खायचा, असं नाही ना होत मित्रा."

सुरजने एका श्वासात प्रेमावीषयीचं तत्वज्ञान सारंगला देऊन त्याच्या हृदयात चालू असलेला प्रेमाचा ज्वालामुखी थोडा शांत केला होता. पण जे थंड पडेल ते प्रेम कसलं...?

काही क्षण शांत राहिलेला सारंग पुन्हा नव्या उमेदीने म्हणाला.. "हो हो आहे मी पण तयार सगळ्यासाठी."

"मेंदूला मुंग्या आल्यात का तुझ्या..?" ...सुरज चेहऱ्यावर कोणताच भाव न दाखवता बोलला.

"तसं समज हवं तर, पण तू हे सांग की मी पुढे काय करू...? मला ती खूप आवडते..." ... सारंग फक्त आता सुरजसमोर गुडघ्यावर बसायचा बाकी होता.

एकंदर सारंगचा स्वभाव बघता आता हा आपलं काही ऐकणार नाही ..असं लक्षात येताच सुरज थोड्या गंभीरतेने म्हणाला, "अरे, मुली इतक्या सहज प्रेमात नाही पडत .."

"मग..?" ..सारंगने प्रश्न केला तेंव्हा त्याच्या नजरेत ५६ सस्यांची व्याकुळता दाटलेली होती.

"अरे मग काय... पहिलं तुला मैत्री पासून सुरुवात केली पाहिजे.." ...सुरजने सारंगच्या खांद्यावर हात ठेवला.

"ते कसं करायचं..?" ... सुरज स्वतः लव्ह गुरु असल्यासारखा सारंग त्याला विचारत होता.

"बघ.. मधुरा रोज १५-२० मिनिटं लवकर येते ना..? मग तू पण ये लवकर, आणि तिच्याशी बोलणं चालू कर.."

"काय बोलू..." ...आता सारंगच्या नजरेतील व्याकुळ सस्यांची संख्या दुप्पट झाली होती. त्याचा प्रश्न ऐकताच सुरज चिडून म्हणाला .. "अरे सगळं मीच सांगू का..? मग प्रेम पण मीच करतो की.."

"जाऊदे सोड, संध्याकाळी क्लास सुटला की जाता जाता वडापाव खात बोलू आपण.."

त्या दिवशी सारंगचं क्लासमध्ये अजिबात लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष संध्याकाळी ७ च्या ठोक्याकडे लागून राहिलं होतं. क्लास सुटल्यावर सुरज त्याला मैत्री ते प्रेमापर्यंत पोहचायचा मार्ग सांगणार होता. क्लास सुटताच सुरजने सारंगला आठवण करून दिली की, "आपल्याला वडापाव खायला जायचे आहे आणि ते ही तुझ्या पैश्याने.." ...दोघेही आपापल्या सायकलवरून कोपऱ्यावरच्या चव्हाण काकूंच्या "शुद्ध तेलात तळलेले वडे" अशी पाटी असणाऱ्या हॉटेल वजा टपरीवर गेले.

"काकू २ वडापाव द्या.." म्हणत सारंगने पैसे पुढे केले.

"मला लस्सी पण पाहीजे रे ." ...तेवढ्यात मागून सुरज म्हणाला.

सारंगने मन मारून खिशातून आणखीन एक नोट काढून पुढे केली आणि मनातच म्हणाला.. "काही हरकत नाही, मधुराच्या प्रेमासाठी ह्या लहान सहान गोष्टी व्यर्थ आहेत.."

वडापाव खात खात सुरजने मूळ विषयाला हात घातला.. "हे बघ सुरवातीला तुलाच पुढे होऊन मधुरा सोबत बोलणं चालू केलं पाहिजे.."

"हे तर मला पण माहिती आहे रे, पण सुरुवात कशी करू..?" ...सारंग वडापावचा एक घास खात जड आवाजात म्हणाला.

"हे बघ, तुला असं दाखवायला लागेल की, तू पण एक हुशार मुलगा आहेस.. आणि तिच्याकडे तिच्या नोट्स मागण्याच्या निमित्ताने सुरुवात कर.. काही शंका विचार..." ... सुरजने विषय अगदी सहज समजावून सांगितला, आणि सारंगला तो समजला देखील.

"बर मग, झालं तर..." ...सारंगने मनोमनीच दुसऱ्या दिवशीचं नियोजन चालू केलं.

दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ उजाडली. (खरं तर दिवस उजाडतो, पण इथे सारंगचा उत्साह इतका दांडगा होता की, संध्याकाळ उजाडली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही...)

असो..

तो क्लास जवळ ३० मिनिटं आधीच जाऊन पोहचला होता. आणि त्या दिवशी पहिल्यांदाच सारंग आदल्या दिवशीची उजळणी करून आला होता. नेहमीप्रमाणे क्लास सुरु होण्यापूर्वी ठीक १५ मिनिटं आधी मधुरा आली.. तिने आपली गुलाबी सायकल तिथे उभी केली जिथे सर्व मुलींच्या सायकल उभ्या केल्या जायच्या. त्यावेळी क्लासमध्ये सर्व मुलं मुली वेगवेगळे बसत तर होतेच, पण त्यांच्या सायकल सुद्धा वेग वेगळ्या ठिकाणी उभ्या केल्या जायच्या.

मधुरा सायकल उभी करून क्लासच्या बाहेर असलेल्या एका बाकावर जाऊन बसली.. आणि आपली वही काढून आदल्या दिवशी शिकवलेलं उजळणी करू लागली. सारंगने सुद्धा ठरवलंच होतं की, आज तर तो मधुराशी बोलणारच, तो जसा मधुरा पुढे पोहचला तेवढ्यात क्लास मधील इतर मुली सुद्धा तिथे पोहचल्या. तरीही सारंग धिटाईने पुढे झाला.. प्रत्येक पावलासोबत तो स्वतःलाच समजाऊ लागला की, मधुराशी बोलण्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे.

मधुरा जवळ पोहचताच त्याने तिला हाक मारली.. "मधुरा.."

बोलणं तर सोडाच.. पण मधुराने आपल्या वहीतून मान वर करून सारंगकडे पाहिलं देखील नाही.

सारंगने पुन्हा एकदा प्रयत्न केला, त्याने सावध पणे हाक मारली ... "मधुरा..."

त्यावेळी मधुराने नजर वर केली आणि सारंगकडे रागातच पाहिलं... "काय पाहिजे ...?"

सारंग मधुराचे ते रागाने भरलेले "काय पाहिजे..?" शब्द ऐकताच घाबरून गेला, खूप हिम्मत करून देकील पुढे काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही राहिला. तो घाबरून दोन पावलं मागे सरकला.. "पोटात गोळा येणे""तोंडातून ब्र देखील न निघणे", या सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ त्याला संदर्भासहीत मिळाला होता.

"नाही, काही नाही.." ...म्हणाला आणि तसाच वळून जायला लागला, तेवढ्यात बाकी मुलींचा हसण्याचा आवाज त्याच्या कानांवर पडला.. त्यामुळे सारंग अगदी शरमेने चिंब झाला होता.

सारंग तिथून निघत होताच तेवढ्यात मुलींच्या हसण्याचा आवाज ऐकून देशपांडे सर क्लासमधून बाहेर आले. विषय समजून न घेताच सारंगकडे रागात बघत म्हणाले.. "तू भेट क्लास सुटल्यावर मला ...”

सारंगला आजवर इतकं वाईट कधीच वाटलं नव्हतं. एकतर मधुराने चारचौघात त्याच्याशी बोलणं टाळलं होतं आणि दुसरं म्हणजे क्लासच्या इतर मुलींसमोर त्याचा उघड अपमान झाला होता. अरे अरे अरे.. खरंतर सर्व मुलं अशा प्रकारे अपमानित व्हायला खूपच घाबरतात. त्यापेक्षा असं म्हणता येईल की, अशा प्रकारेच अपमानित व्हायला खूप घाबरतात. आणि तो अपमान आज सारंगने कमावलाच होता.

बाकी तसं म्हटलं तर एक दोन मित्र सोबत घेऊन जग जिंकण्याची हिम्मत बाळगणारा सारंग मुलींसमोर मात्र हतबल रहायचा. प्रेम करणं आणि प्रेम व्यक्त करणं या परस्पर भिन्न गोष्टी, ज्यात सारंगला मधुरासमोर व्यक्त होणं तितकं जमत नव्हतं, प्रेम करण्यात सारंगने विद्वत्ता तर मिळवली होतीच पण ते व्यक्त करण्याच्या बेसिक परीक्षेत मात्र तो पूर्ण नापास होऊन जायचा.

क्लासमध्ये कसा-बसा सारंगने वेळ घालवला, त्या दिवशी तो कोणाच्याही नजरेला नजर द्यायची हिम्मत करत नव्हता. क्लासमध्ये संपूर्ण वेळ त्याला असं वाटत होतं की, अजूनही बाकीच्या मुली त्याच्यावर हसत आहेत. कशी-बशी त्या दिवशीची वेळ निघून गेली, क्लास सुटला. सरांनी ठीक ७ वाजता सर्व मुलींना जायला सांगितलं, आणि सगळ्या मुलांना तिथेच थांबवलं. सर्व मुली निघून जाताच सर अगदी दात ओठ खात सारंगकडे बघत म्हणाले, ..."आज जे तुम्ही केलं आहे ना, ते इथे नाही चालणार. मुलींच्या घरचे पूर्ण विश्वासाने माझ्याकडे क्लाससाठी पाठवतात.. त्या विश्वासाला बट्टा लागलेला मला नाही चालणार.. तुमच्यामुळे माझ्या क्लासचे नाव खराब होईल असं तुमचं वागणं मी अजिबात खपवून घेणार नाही.."
सारंग आणि सुरज खाली मान घालून गप्प ऐकत होते. बाकी मुलांना नेमका विषय काय ते कळायला थोडं जड जात होतं. त्यांना अंदाजही नव्हता, की का बरं सर आज इतके चिडले आहेत. शेवटी सरांनी आपलं मत मांडलं. ते सारंगकडे बघत म्हणाले.. "सारंग उद्यापासून क्लासला नाही आलास तरी चालेल! ...आणि तुझ्या बाबांचा नंबर दे.. मी बोलतो त्यांच्याशी.."
सरांचे शब्द ऐकताच सारंग पूर्ण घाबरला.. काय करावं त्याला सुचेना .. केवळ एखाद्या मुलीसोबत बोलणं म्हणजे इतकी मोठी चूक आहे? त्याने सरांचं बोलणं ऐकून बराच वेळ सरांची माफी मागितली आणि त्यांना विश्वास दिला की, पुन्हा असं काही नाही होणार.. आणि तो इथून पुढे क्लास मधल्या प्रत्येक टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवून दाखवणार.

सारंगच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर सरांना सुद्धा त्यांच्या एका विध्यार्थ्याच्या मासीक फी चा विचार आला आणि त्यांनी सारंगला एक संधी द्यायची ठरवलं. सगळं रामायण झाल्यानंतर क्लास मधून निघून सारंग आणि सुरज वडापाववाल्या काकूंच्या दुकानाबाहेर असणारया लाकडी बाकड्यावर जाऊन बसले. जाईपर्यंत सारंग काही बोलला नाही.. झाला सगळा प्रकार बघता त्या दिवशी सुरजनेच वडापावचे पैसे पुढे केले.. सुरजने सारंग कडून सर्व समजून घेतले की, नेमकं झालं काय..? आणि म्हणाला, "आता तरी प्रेमाचं भूत उतरलं ना डोक्यावरून..?"
त्यावर सारंग वडापावमध्ये थोडी हिरवी चटणी टाकत म्हणाला, "नाही, आता तर पुर्विपेक्षा अजून जास्त मानसीक तयारी झाली आहे.."
त्यानंतर दोघेही घरी निघून गेले. सारंगला झाल्या प्रकाराबद्दल खूप वाईट तर वाटत होतं, आणि त्याने मनात विचार करून ठेवला होता की, त्या खडूस मधुराला एक दिवस धडा शिकवायचा.

आता सारंग क्लास सुरु होताच ५ मिनिटांनी वर्गात यायचा आणि क्लास सुटताच इथे तिथे न बघताच खाली मान घालून निघून जायचा. काही दिवस असेच निघून गेल्यानंतर सरांनी एके दिवशी क्लासमध्ये टेस्ट घ्यायचे ठरवले..

टेस्ट झाली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे पेपर देऊ लागले तेंव्हा मधुरा म्हणाली.. "सर या वेळी पण मीच पहिली आले आहे ना?"

सर मधुराचा पेपर तिच्याकडे देत म्हणाले.. "हो, आतापर्यंत तरी तूच पहिली दिसतेस मला, २० पैकी १७ मिळालेत तुला.. पण अजून २-३ पेपर तपासायचे बाकी आहेत."

उरलेल्या पेपरमध्ये एक पेपर सारंगचा होता आणि एक सुरजचा.. सरांनी सुरजचा पेपर तपासला, त्याला २० पैकी साडेसात मार्क मिळाले होते.. त्यांनी रागाने सुरजचा पेपर त्याच्याकडे देताच बाकीच्या मुली हसू लागल्या. आता शिल्लक राहिला होता तो सारंगचा पेपर.
सरांनी शेवटचा पेपर तपासला, आणि म्हणाले... "अरे वाह...! या वेळी तर कमालच झाली.. सारंगला २० पैकी १९ मार्क मिळालेत."

सारंगचा पहिला नंबर येताच मधुराचा चेहरा पडला. ती शेजारी बसलेल्या मुलीला रागाने चिमटा काढत म्हणाली, "आता बघच, पुढच्या वेळी नाही येणार तो पहिला.."
तेव्हढ्यात त्या मुलीने मधुराचा हात झटकला आणि म्हणाली... "मग मला का चिमटा काढतेस..म्हशी ?"

क्लासमधील हुशार मधुराला सारंगने एका क्षणात मागे टाकलं होतं.. आयुष्य कधी कधी सरळ धावणाऱ्या रस्त्यावरून अचानक यू-टर्न घेऊन मागे जाऊ लागते असं काहीसं मधुराच्या बाबतीत झालं होतं.

त्या टेस्टनंतर सारंग आता पूर्वीसारखा नॉर्मल झाला होता. पहिल्यांदाच पहिला आल्याबद्दलची पार्टी सुरजने सारंगकडून उकळली होती. मधुरा मात्र मागच्या टेस्टमध्ये झालेला अपमान विसरली नव्हती.. ती पुढच्या टेस्ट ची वाट बघत होती. पुढची टेस्ट झाली. निकाल नेहमीप्रमाणे अनपेक्षित होता.
सुरज २५ पैकी साडेआठ. त्याची एका मार्काने का होईना पण प्रगती झाली होती.
मधुरा २५ पैकी २१
आणि सारंग २५ पैकी २४

वर्गात हुशार असणाऱ्या मुलींसाठी इतर मुलं ही त्यांच्या बरोबरीची कधीच नसतात. पण हुशार मुलांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो.
एके दिवशी कॉलेजमध्ये मुलींचं काही Function असल्यामुळे एकही मुलगी क्लासमध्ये गेली नव्हती. तरीही सरांनी त्या दिवशी पुढचं प्रकरण शिकवलं होतं. दुसऱ्या दिवशी जेंव्हा सर्व मुली क्लासला गेल्या तेंव्हा त्यांनी हट्ट धरला की, "सर काल शिकवलेले पुन्हा शिकवा please.."
त्यावर सर म्हणाले, "आधी तुम्ही कोणाची तरी वही घेऊन सर्व नोट्स लिहून काढा, मग पुन्हा समजावून सांगेन तुम्हाला.."
नोट्स कोणाच्या घ्यायच्या याबद्दलची खस खस पिकायला लागताच मधुराच म्हणाली, "सारंगच्या नोट्स ठीक राहतील, तोच सध्या पहिला येतोय ना क्लास मध्ये.."
हे ऐकताच सुरजने सारंगकडे बघून डोळा मारल्याचं मधुराने पाहिलं होतं. सारंगने काहीच न बोलता आपली वही मधुराकडे दिली. त्या संध्याकाळी सारंगने वही मधुराला दिल्याच्या आनंदात सुरजने त्याच्याकडून २ वडापाव आणि एक ग्लास लस्सी उकळली. वडापाव खाऊन झाल्यावर लस्सीचा ग्लास ओठांना लावत सुरजने पहिल्यांदाच मधुराचा उल्लेख मधुरा वहिनी असा केला, आणि म्हणाला... "मधुरा वहिनी पण तुझ्या प्रेमात पडली वाटतं .."
मधुराने घरी जाताच सारंगची वही उलट्या बाजूने उघडली. खरंतर वह्यांमध्ये खऱ्या कामाच्या गोष्टी पहील्या नाही तर शेवटच्या पानांवर कोरलेल्या असतात.

एखाद्याच्या मनातलं ओळखायचं असेल तर त्याची वही किंवा डायरी शेवटच्या बाजूने उघडून शेवटची २-३ पानं वाचावीत, जिथे शब्द कमी आणि भावनांचा ओलावा अधिक दिसून येतो.
मधुराने पाहिलं, सारंगच्या वहीमध्ये शेवटच्या काही पानांवर तिचं नाव बऱ्याच ठिकाणी लिहीलं होतं, आणि खोडलं होतं. पण एक दोन ठिकाणी सारंग मधुराचं नाव खोडायला विसरला होता. सारंगच्या वहीत आपलं नाव वाचून मधुरालाही छान वाटलं.. अशा तऱ्हेचं छान वाटणं हे तिच्यासाठी पहिल्यांदाच झालं होतं.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मधुरा लवकर येऊन क्लास जवळ आपली सायकल उभी करत होती तितक्यात सारंग सुद्धा तिथे पोहचला.. ति बॅगेतून 
सारंगची वही काढून त्याच्याकडे देत म्हणाली, "थँक यू सारंग, आणि त्या दिवशी साठी सॉरी..!"
सारंगच्या मनात तर लाडूच फुटत होते, पण त्या फुटणाऱ्या लाडवांचा आवाज बाहेर येऊ न देता सारंग म्हणाला.. "ठीक आहे.. काही हरकत नाही..." ... काही क्षण शांत राहिल्यानंतर सारंगला वाटलं की, मधुरा काही बोलेल, मधुराला वाटलं की सारंग काही बोलेल. पण दोघेही काही बोलले नाही.

सुरुवातीच्या अशा भेटीत बऱ्याचदा दोघांमधल्या शांततेलाच एक मेकांशी सर्व काही बोलावं लागतं. दोघांनाही बोलायचं होतं.. पण दोघही शांतच होते.
तेवढ्यात मधुरानेच विषय काढला.. "एक दोन ठिकाणी तुझं अक्षर काही समजलं नाही, क्लास सुटल्यावर सांगशील का ..?"

"हो हो नक्कीच .. सात नंतर भेटू क्लास सुटल्यावर.."
त्यानंतर सारंग क्लासमध्ये प्रत्येक मिनिटाला घड्याळातील काटे बघत होता, कधी ते काटे एकत्र येऊन ७ वाजवतील आणि कधी तो मधुराशी बोलेल. मधुराचं देखील वेगळं काही नव्हतं, कधी नव्हे तसं तीचं सुद्धा लक्ष त्यादिवशी क्लासमध्ये नव्हतं. तसही अक्षर तर तिला सर्व समजत होतं, फक्त तिला सारंग सोबत बोलायचं होतं.

क्लास सुटल्यावर सुरजने सारंगला हाक मारली पण काही कारण काढून सारंग सुरजला "तू पुढे हो.." म्हणाला.
सर्व मुली एक एक करून निघून गेल्या. पण मधुरा मात्र तिथेच थांबली होती. सारंगने सर्व मुलं निघून जाण्याची वाट पाहीली. त्याला वाटत नव्हतं की, त्याला आणि मधुराला एकत्र बोलताना कोणी पहावं. सगळे निघून जाण्याची वाट बघता बघता त्याला थोडा उशीर झाला.
सारंग समोर येताच मधुरा म्हणाली.. "७ वाजता म्हटलं होतं ना, आता तर सव्वासात झालेत."
"सॉरी, मी ते सर्व जाण्याची वाट बघत होतो.." ...सारंग खांद्यावरची बॅग नीट करत म्हणाला.
"का..?" मधुराने थोडंसं आश्चर्याने विचारलं.
"अरे जाऊ दे ना.." ...सारंग म्हणाला.
"नाही, सांग ना.." मधुराही तितक्याच हट्टाने म्हणाली.
"मला नव्हतं वाटत की आपल्याला कोणी बोलताना पहावं, म्हणून.." ...सारंग थोडं संकोचून बोलला.
हे ऐकून मधुरा हसली, आणि म्हणाली.. "मला बोलण्यासाठी इतका नको कोणाचा विचार करू, समजलं..? तुला वाटलं बोलावसं बिनधास्त बोल." ...असं म्हणत मधुराने आपल्या घरचा टेलिफोन नंबर लिहिलेला एक कागद सारंगच्या हातात ठेवला.

सारंग थोडा लाजतच म्हणाला "ठीक आहे."
"बरं, तुला कुठे अक्षर समजलं नाही..?".. सारंग आपली वही मधुराकडे देत म्हणाला.
वही बघताच मधुरा थोडी बावरली.. आणि पुढच्या क्षणी स्वतःला सावरत वहीत तिला न समजलेलं अक्षर शोधण्याचं नाटक करू लागली. नंतर वहीतून नजर वर करून म्हणाली.. "आता सापडत नाहीय .. एक काम करते, घरी जाऊन पुन्हा बघते आणि खुणा करून उद्या क्लास सुटला की विचारते.."
"ठीक आहे.." ..सारंग म्हणाला.
दोघांचं बोलणं तसं संपलं होतं.. पण दोघेही तिथून निघायला तयार नव्हते... "तुला काही बोलायचे आहे का ?" ..सारंग बोलणं सुरु रहावं म्हणून बोलला.
"नाही" ..मधुरा काही क्षणांचा विचार करून बोलली. "आणि तुला तर काही बोलायचं नाही ना ?"
"हो काही बोलायचं आहे मला."

"हा बोल ना." ...मधुरा क्षणाचाही विलंब न करता बोलली.

"उद्या सांगेन.." ...सारंग म्हणाला.

"आताच सांग ना." ...मधुरा तितक्याच लाडिक हट्टाने म्हणाली.

"नाही नको, उद्या नक्की सांगतो."

"ठीक आहे, पण उद्या नक्की सांग.. उद्या ठीक ७ वाजता भेटू.." 


त्यानंतर दोघेही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता भेटले.. पुढच्या दिवशीही आणि त्याच्या पुढच्या दिवशीही. रोज दोघेही कोणती ना कोणती गोष्ठ अपूर्ण सोडायचे, ज्या कारणाने ते पुन्हा दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटत. आता 
सारंगचेही मार्क चांगले येत होते, त्यामुळे सरांनी सुद्धा त्याला मधुराशी बोलताना कधी अडवलं नव्हतं. रोज जेवढा वेळ सारंग आणि मधुरा एक मेकांशी बोलत तेवढा वेळ सुरज मात्र बाजूच्या रोड वर सारंगची वाट बधत सायकल वर बसून असायचा.

संध्याकाळी ६ वाजता जसं घड्याळातील २ काटे काही क्षणांसाठी का असेना दोनाचे एक होऊन जातात, तसंच मधुरा आणि 
सारंगला रोज भेटावसं वाटायचं, त्याच क्लासच्या बाहेर जिथे आजही मुलं आणि मुलींच्या सायकल वेगवेगळ्या उभ्या केल्या जायच्या.



- अपूर्ण


#SrSatish🎭

       

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

मुक्ता

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. भौतिक जगाकडे उघड्या नजरेने पाहिलेल्या काही घटनांना शब्दरूपी जिवंतपणा देण्याचा प्रयत्न लेखकाकडून या लेखात करण्यात आला आहे. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.


शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

🌺 सोनचाफा 🌺

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

शनिवार, ११ मे, २०२४

विश्वचैतन्य आणि विज्ञान

मी शाळेत असताना हा किस्सा घडला होता. बरेच दिवस सांगायचं सांगायचं म्हणत होतो, पण कागदावर मांडण्यासाठी शब्द सापडत नव्हते. हा किस्सा नेहमीच माझी श्रद्धा वाढवत आला आहे.

 

मी ९ वी च्या वर्गात असताना माझ्या विज्ञानाच्या पुस्तकावर स्वामी विवेकानंदांचा फोटो होता. स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व म्हणजे अध्यात्मिक परंपरेचं केंद्र म्हणायला हरकत नाही.

एक दिवस वर्गात विज्ञानाच्या शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणं म्हणजे अभिमानास्पद वाटत होतं आणि स्वतःचा नास्तिकपणा जगापुढे आणायचा होता) त्यांनी माझ्या पुस्तकावरचा विवेकानंदांचा फोटो पाहिला, आणि मला वर्गात उभ केलं.

"तुझ्या पुस्तकावर हा फोटो कोणाचा आहे?" ...सरांनी प्रश्न केला.

"काय झालं सर...? स्वामी विवेकानंद आहेत..." ...मी पुस्तक हातात घेत म्हणालो.

"विवेकानंद म्हणजे कोण माहित आहेत का?"

"हो सर, ज्यांनी हिंदू धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला... वेदांत आणि भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती.."

"म्हणजे तुझा देवावर विश्वास आहे तर?" ...त्यांनी पुढचा प्रश्न केला.

"हो सर निश्चितच!" ...मी हातातील पुस्तक बघत म्हणालो.

"देव हा चांगला आहे का?" ...सरांनी दुसरा प्रश्न केला.

"हो सर!" ...मी अगदी सहज उत्तरं देत होतो.

"देव हा सर्व शक्तिमान आहे का?" ...माझी उत्तरं ऐकून सरांच्या प्रश्नांमध्ये नास्तिकता तीव्रतेने जाणवत होती.

"हो सर, अर्थातच!" ...प्रत्येक उत्तरासोबत माझाही आत्मविश्वास वाढत होता.

"माझा भाऊ कॅन्सरने गेला, त्या आधी त्याने खूप पूजा - प्रार्थना केली होती." ...सरांनी स्वतःची बाजू मांडायला सुरुवात केली.

"कोणी आजारी असेल तेंव्हा आपण देवाच्या मदतीला धावतो, मग देवाने का मदत केली नाही माझ्या भावाला? मग देव चांगला नाही का?" सरांनी आपलं परखड मत मांडलं. त्यांचे शब्द ऐकून सर्व वर्ग स्तब्ध झाला.

"कोणी याचं उत्तर देऊ शकतं का?" ...सरांनी संपूर्ण वर्गाला उद्देशून एक प्रश्न केला, पण सर्व वर्ग शांत होता.

"ठीक आहे. मी अजून काही विचारतो."

सर पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाले... "राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्ती चांगल्या असतात का?"

"नाही" ...मी म्हणालो.

"राक्षसी प्रवृत्ती कोणी बनवली ...देवानेच ना..."

"होय..."

"दुष्ट शक्ती किंवा लोक ते चांगले असतात का?"

"नाही सर ..."

"त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?"

"हो..."

"या जगात आजारपण, दु:ख, क्रूरता या सर्व वाईट गोष्टी आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?" ...मी आता शांत झालो होतो. सर मात्र बोलतच होते.

"विज्ञान सांगते की, आपल्याला ५ ज्ञानेंद्रीय असतात. ज्याने आपण जग समजून घेऊ शकतो. मग सांग तू कधी देवाला बघितलं आहे का?'

"नाही सर..." ...मी पुन्हा बोलता झालो.

"कधी देवाला ऐकलं आहेस का? ...स्पर्श केलाय का? ...अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान झाले आहे?"

"नाही सर... असं काहीही नाही." ...मी त्यांच्या नजरेला नजर देत बोलत होतो.

"मग निरीक्षणार्थ, परीक्षणार्थ विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पनाच अस्तित्वात नाही." ...सरांनी विज्ञानाचा दाखला देत स्वतची नास्तिकता परखड पणे व्यक्त करणं सुरूच ठेवलं.

"मग याला तू उत्तर काय देशील?"

"मी म्हणेन माझी श्रद्धा आहे." ...मी थोड्या शांत चित्ताने म्हणालो.

"हो अगदी... इथेच श्रद्धा आणि विज्ञानाचं घोडं अडतं. माणूस विचार करणं सोडून देतो. आणि सगळं श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो."

सरांचं विद्यांनाची पुंगी वाजवणं चालूच होतं.

"मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का सर.." ...मी माझ्या हातातील पुस्तक खाली ठेवलं.

"हो हो, विचार की.." ...बराच वेळ उभे असलेले सर स्वतःच्या खुर्चीत बसत म्हणाले.

"सर उष्णता अस्तित्वात आहे का?.." ...सरांच्या विज्ञानाचा आधार घेत मी पहिला प्रश्न केला.

"हो आहे की..." ...सरांनी काहीही विचार न करताच उत्तर दिलं.

"आणि शीतलता?" ...सरांच्या उत्तरानंतर लगेच मी पुढचा प्रश्न केला.

"हो अर्थातच ..." ...सरांनी ही तितक्याच पटकन उत्तर दिलं.

"नाही सर... असं काहीच अस्तित्वात नाही." ...माझे शब्द ऐकताच वर्गातील शांतता पुन्हा वाढली.

"सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शून्य अंशाचा ४५८ अंश खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेच उष्णतेची कमतरता... म्हणजे शीतलता."

"तूम्ही विज्ञानाचा दाखला देत ज्या पाच ज्ञानेंद्रियांचा उल्लेख केलात, त्याच प्रमाणे हे दृष्य विश्व सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांमध्ये सत्व, रज आणि तम या तीन गुणांची मिळून प्रकृती निर्माण झाली आहे आणि ती ब्रम्हस्वरूपात विसावलेली आहे."

"प्रत्येक प्राणीमात्रांचे शरीर हे ह्याच प्रकृतीने बनलेले आहे. त्याच प्रकृतीचा विस्तार केला तर अनेक तत्वे निर्माण झालेली दिसतील. हा झाला जड वास्तू जी डोळ्यानां दिसते तीचा अभ्यास, पण या अनंत ब्रम्हांडी, जो परमात्मा अनेक वर्षे साधना करूनही समजत नाही.. जो अदृष्य आहे... पण त्याच्याच सत्तेने हे विश्व चालते. ते विश्व चैतन्य.. तो ब्रम्हांडनायक.. परमात्मा.. भगवंत याच चराचरात व्यापलेला आहे. जो प्रत्येक जिवामध्ये ह्रदयात सामावलेला आहे. त्याला समजून घेणं आणि अभ्यास करणं इतकं सहज सोपं नाही सर.."

शांत झालेला वर्ग माझ्या शब्दांकडे लक्श देऊन होता. सरांनाही त्यापुढे काय बोलावं सुचत नव्हतं..

"अंधाराबद्दल काय मत आहे तुमचं. ते अस्तित्वात आहे का?" ...मी आता दुसरा प्रश्न केला.

"हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच की?" ...सरांनी आता सावध पणे उत्तर दिलं.

"तुम्ही पुन्हा चुकत आहात." ...मी सरांच्या उत्तराला तिथेच तोडत म्हणालो.

"आपलं तर्कशास्त्र थोडंसं चुकतंय."

"कसं काय..? सिद्ध करुन दाखव." ...सरांनी विश्लेषण मागितलं.

"जर आपण सृष्टीच्या द्वैत तत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात."

मला कळत नव्हतं की, इतकं मी कसं बोलू शकत होतो. त्या वेळी माझ्या प्रत्येक शब्दाचा साक्षीदार कदाचीत स्वतः विश्वचैतन्यच असेल.

"जिथे तुमचं विज्ञान विचारांबद्दल सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करते. तेच विज्ञान डोक्यात येणारे विचार कसे असतात हे देखील विश्लेशीत करु शकत नाही... हे जरा विचित्र नाही का? ...

संपूर्ण वर्ग अजूनही शांतच होता.

"विज्ञान फक्त चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करतं. त्याचा उगमस्त्रोत माहीत नसणं हे वेडेपणाचे नाही का?... मी तर म्हणेन की जिथे तुमचं विज्ञान संपतं तिथे अध्यात्माची सुरुवात होते.."

सरांनी कदाचित आता माघार घेतली होती.

"मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही... फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु."

"सर तुम्ही ही गोष्ट मानता का... की आपण माकडांचे वंशज आहोत?"

"हो नक्कीच... उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा." ...सरांना बऱ्याच वेळाने बोलायची संधी मिळाली होती.

"मला सांगा सर आपण कोणीही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली आहे का? मी तरी नाही पाहिली.. मग याचा अर्थ असा होतो का, की आपण अजूनही माकडच आहोत ..."

शांत असलेल्या वर्गात अचानक हशा पिकला.

"सर शेवटचा प्रश्न मी सर्व वर्गाला विचारतो.. तुम्ही कधी सरांची बुद्धी पाहीली आहे का... कधी स्पर्श केलंय का ? नाही ना ?"

संपूर्ण वर्ग नाही... म्हणून जोरात ओरडला.

"माफ करा सर, मग आता तुम्ही जे शिकवता ते सगळं बुद्धीहीन आहे असं अम्ही म्हटलं तर..."

"त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..." ...आता मात्र सरांच्या चेहऱ्यावर स्मित होतं.

त्यांना सुद्धा पटलं होतं...

"अगदी बरोबर बोलत आहात सर... श्रद्धा असली पाहिजे.." ...मी सरांचा तोच शब्द पकडला .... "संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा तीच श्रद्धा ठेवून रेड्यामुखी वेद वदवले होते. संत नामदेवांनी सुद्धा तीच श्रद्धा ठेवून साक्षात विठ्ठलाला जेऊ घातलं होतं.. देव आणि माणूस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा... देव आहे की नाही असा प्रश्न पडतो म्हणजे दुर्दैवच... म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरं काही नाही..."

माझ्या शेवटच्या काही शब्दांनंतर सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या त्यावेळी शिकागो मधील धर्म परिषदेत "my sisters and brothers of America" असं म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताच पहिली काही मिनिटं संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा वर्षाव केला होता त्या क्षणाची आठवण झाली..


...अपूर्ण

शनिवार, १७ जून, २०२३

आई.. ❤️

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.


प्रस्तावना -
जवळपास दोन अडीज वर्षांच्या विश्रांती नंतर पुन्हा एक ब्लॉग आपल्यासाठी.

या कथेतील "सतिश" ही केवळ एक व्यक्ती नसून, संपूर्ण जगातील त्या प्रत्येकाचा तो एक चेहरा आहे जो आपल्या आईपासून आणि आपल्या घरापासून दूर राहतो.

मी हा ब्लॉग माझ्या त्या मैत्रिणीला समर्पित करतो जिने काही महिन्यांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. मैत्रीण असली तरीही मी तिची तुलना "आई" सोबत करणार नाही पण तिच्या वाट्याचं फळ तिच्या पदरात नाही टाकलं तर तिने माझ्यासाठी केलेल्या कृतार्थतेला मी कुठेतरी विसरून गेल्यासारखं होईल.
 
विशेष आभार -
शैलेश सावंत, सुरज परमेकर, निहारीका किरवीड आणि शंतमी पाटील.

 

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

कविता ..

कवितेला शब्दांचं किंवा यमकांच बंधन नसतं, त्यात असते फक्त गुंतागुंत भावनांची.
कविता मुक्त असते, एखाद्या ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यासारखी. वाहत्या प्रवाहाच्या बाहेर पडलेल्याला स्वतःचा मार्ग दाखविणाऱ्या दिव्या सारखी.

कविता ही मधासारखी असते, कित्येक मधमाशांनी गोळा करून आणलेल्या फुलांच्या रसासारखी.
कविता कधीही येते, आपल्यापाशी राहून जाते, तिला काळ वेक काहीच नसते. कधी झोपेतून उठवते, तर कधी झोपूच देत नसते.

कविता कधी विनोद बनून चेहऱ्यावर हसू फुलवते, तर कधी भावनीक होऊन अश्रूंचे बांध फोडून टाकते.
कविता आली तर दिवसभर सोबत असते, तर कधी तोंडही दाखवत नसते.

कविता ही प्रत्येकाचा श्वास असते, कोणाला ती व्यक्त करता येते, तर कोणाला याचा गंध ही नसतो.
कवितेला स्वतःचं रंग रूप नसतं, लिहिणारा प्रत्येकजण स्वतःच्या परीनं तिला घडवत असतो.

कवितेला स्वतःच्या भावनाही नसतात, लिहिणाऱ्यांच्या मनचे भाव स्वतः घेऊन ती जगत असते.
कविता ही कविता असते, कधी तुमच्यासाठी कधी माझ्यासाठी कधी आपल्या सगळ्यांसाठीच मन मोकळं करण्याचा आधार असते.

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

Birthday Gift 🎁🎉

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

क्रांति सूर्य !

टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.

कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!"

त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"

लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!

अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,

"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.

आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे".

बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे ये.."

सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?

तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,

"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?

"अवश्य! बोल ना.."

बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,

"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".

क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,

"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?

अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,

"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी - आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!

अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले. इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ" या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व - त्याच्या हाती दिले. म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!"

सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.

तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस"?

हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला...

"माझं नाव, विनायक दामोदर सावरकर!" 🚩

मन सुद्ध !!

प्लॅटफॉर्म नंबर १ वरून ट्रेनने दादर सोडलं. ट्रेन चालू होताच धावत धावत ५०-५५ वयाचे एक गृहस्थ लेडिज डब्यात चढले. डोळे अगदी डबडबलेले, चेहरा त्रासलेला, चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसत होता. एरवी असं कोणी लेडीज डब्बायत चढलं तर बायकांचा एकदम गदारोळ सुरु होतो. उतरो उतरो, असा त्रागाही करू लागतात. पण या भल्या माणसाकडे पाहून सगळ्याजणी एकमेकींकडे पाहायला लागल्या.

ते गृहस्थ आत येऊन एका मोकळ्या बाकड्यावर बसले. खिडकीतून बाहेर एकटक पाहत होते. डोळ्यातून येणारं पाणी लपवायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नाही.. डोळ्यांत ताराळलेलं पाणी गलांवरून ओघळून खाली उतरलं होतं.. ते बघून समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एक मुलीने त्यांना स्वतःहून विचारलं, "काय.. झालं? रडताय का तुम्ही??"

या अनोळखी जगात कोणीतरी आपली चौकशी करतंय हे बघून त्यांना हुंदका अनावर झाला.. ते म्हणाले, "केईएममध्ये हिला अॅडमिट केलंय अन् टाटामध्ये थोरला मुलगा व्हेंटिलेटरवर आहे.. आधी मुलाला कोरोनाने गाठलं, आणि त्याचा धसका घेऊन हिची सुद्धा प्रकृती बिघडली.."

त्या काकांच्या शब्दांतील ओलावा बघितला तर कित्येक दिवसांनी त्यांना कोणीतरी आपुलकीचं भेटलं आहे आणि ते आपलं मन मोकळं करत आहेत असं जाणवलं.. स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत ते सांगत होते..

"दोघींना होणारा त्रास पाहून सकाळपासून माझं मला काही सुचत नाही. एकीकडे हिच्यासाठी जीव तुटतो, तर दुसरीकडे ऑक्सिजन मास्क तोंडावर लावलेला मुलाचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नाही.. पण मी घरातला कर्ता पुरुष.. मला कुणाला सांगता येत नाही. खरं तर रडायचं होतं मोकळेपणाने.. म्हणून ठरवून लेडिज डब्यात चढलो.."

डब्ब्यात फारशी गर्दी नव्हती. प्रत्येक बाकड्यावर मोजक्याच स्त्रिया मुली बसल्या होत्या.. त्या काकांचं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून काहीजणी काकांच्या जवळ येऊन बसल्या..

काकांनी खिशातून रुमाल काढला आणि चष्माच्या आतून डोळे टिपले.. काही जणींनी बॅगेतलं चॉकलेट दिलं, काहींनी पाण्याची बाटली पुढे केली.. काका थोडे सावरले.. म्हणाले, "आपल्यात पुरुष रडत नाही, खरं तर त्याने रडायचं नसतंच. पण तुम्हा मुळींच मन आणि आम्हा पुरुषांचं मन देवाने वेगवेगळ नाही ना बनवलं.. मन असतंच की आम्हालाही.."

त्या काकांचं बोलणं ऐकून तिथेच बाजूला बसलेल्या एका महिलेने कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा बेताने स्वतःचे डोळे टिपले..

"माझ्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या त्या दोघांनीही होणारा त्रास पाहून माझं आजवर खंबीर असणारं मन जरा हेलावलंय. लेडिज डब्ब्यात चढलो म्हटल्यावर तुम्ही आरडाओरडा कराल, असा विचारही आला नाही.. उलट तुम्ही सगळ्याजणी विचारपूस करतायत.. थॅक्स.."

काकांनी डोळ्यांवरचा चष्मा काढून रुमालाने संपूर्ण चेहरा पुसला.

खरच पुरुषांना इतकं अवघड असतं का रडणं? रडून मन मोकळं करणं..?? भगवंतानि मन सगळ्यांना सारखाच दिलं असेल ना.. सगळ्यांसाठी कायम खंबीर असलेल्या त्या कर्त्या पुरुषांचही जगणं समजून घ्यायला पाहिजे की कोणीतरी.

विलेपार्ले येताच काका उतरून निघून गेले.. ते उतरताना त्यांच्या मनावरचं ओझं कमी झाल्याचं जाणवलं. आणि जाता जाता डब्यातील प्रत्येक महिलेला स्त्रियांना ते काका अप्रत्यक्षपणे सांगून गेले की, तुम्ही मुलांना वाढवताना त्यांना जरूर सांग, पुरुषानेही मोकळेपणाने रडायचं असतं. हक्काने कोणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेवून मनातलं सांगायचं असतं. मन मोकळं झालं नाही तर हृदयावर एक बॉम्ब घेऊन जगण्यासारखं आहे, ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो..


.. अपूर्ण