मी शाळेत असताना हा किस्सा घडला होता. बरेच दिवस सांगायचं सांगायचं म्हणत होतो, पण कागदावर मांडण्यासाठी शब्द सापडत नव्हते. हा किस्सा नेहमीच माझी श्रद्धा वाढवत आला आहे.
मी ९ वी च्या वर्गात असताना माझ्या विज्ञानाच्या पुस्तकावर स्वामी विवेकानंदांचा फोटो होता. स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व म्हणजे अध्यात्मिक परंपरेचं केंद्र म्हणायला हरकत नाही.
एक दिवस वर्गात विज्ञानाच्या शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणं म्हणजे अभिमानास्पद वाटत होतं आणि स्वतःचा नास्तिकपणा जगापुढे आणायचा होता) त्यांनी माझ्या पुस्तकावरचा विवेकानंदांचा फोटो पाहिला, आणि मला वर्गात उभ केलं.
"तुझ्या पुस्तकावर हा फोटो कोणाचा आहे?" ...सरांनी प्रश्न केला.
"काय झालं सर...? स्वामी विवेकानंद आहेत..." ...मी पुस्तक हातात घेत म्हणालो.
"विवेकानंद म्हणजे कोण माहित आहेत का?"
"हो सर, ज्यांनी हिंदू धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला... वेदांत आणि भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती.."
"म्हणजे तुझा देवावर विश्वास आहे तर?" ...त्यांनी पुढचा प्रश्न केला.
"हो सर निश्चितच!" ...मी हातातील पुस्तक बघत म्हणालो.
"देव हा चांगला आहे का?" ...सरांनी दुसरा प्रश्न केला.
"हो सर!" ...मी अगदी सहज उत्तरं देत होतो.
"देव हा सर्व शक्तिमान आहे का?" ...माझी उत्तरं ऐकून सरांच्या प्रश्नांमध्ये नास्तिकता तीव्रतेने जाणवत होती.
"हो सर, अर्थातच!" ...प्रत्येक उत्तरासोबत माझाही आत्मविश्वास वाढत होता.
"माझा भाऊ कॅन्सरने गेला, त्या आधी त्याने खूप पूजा - प्रार्थना केली होती." ...सरांनी स्वतःची बाजू मांडायला सुरुवात केली.
"कोणी आजारी असेल तेंव्हा आपण देवाच्या मदतीला धावतो, मग देवाने का मदत केली नाही माझ्या भावाला? मग देव चांगला नाही का?" सरांनी आपलं परखड मत मांडलं. त्यांचे शब्द ऐकून सर्व वर्ग स्तब्ध झाला.
"कोणी याचं उत्तर देऊ शकतं का?" ...सरांनी संपूर्ण वर्गाला उद्देशून एक प्रश्न केला, पण सर्व वर्ग शांत होता.
"ठीक आहे. मी अजून काही विचारतो."
सर पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाले... "राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्ती चांगल्या असतात का?"
"नाही" ...मी म्हणालो.
"राक्षसी प्रवृत्ती कोणी बनवली ...देवानेच ना..."
"होय..."
"दुष्ट शक्ती किंवा लोक ते चांगले असतात का?"
"नाही सर ..."
"त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?"
"हो..."
"या जगात आजारपण, दु:ख, क्रूरता या सर्व वाईट गोष्टी आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?" ...मी आता शांत झालो होतो. सर मात्र बोलतच होते.
"विज्ञान सांगते की, आपल्याला ५ ज्ञानेंद्रीय असतात. ज्याने आपण जग समजून घेऊ शकतो. मग सांग तू कधी देवाला बघितलं आहे का?'
"नाही सर..." ...मी पुन्हा बोलता झालो.
"कधी देवाला ऐकलं आहेस का? ...स्पर्श केलाय का? ...अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान झाले आहे?"
"नाही सर... असं काहीही नाही." ...मी त्यांच्या नजरेला नजर देत बोलत होतो.
"मग निरीक्षणार्थ, परीक्षणार्थ विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पनाच अस्तित्वात नाही." ...सरांनी विज्ञानाचा दाखला देत स्वतची नास्तिकता परखड पणे व्यक्त करणं सुरूच ठेवलं.
"मग याला तू उत्तर काय देशील?"
"मी म्हणेन माझी श्रद्धा आहे." ...मी थोड्या शांत चित्ताने म्हणालो.
"हो अगदी... इथेच श्रद्धा आणि विज्ञानाचं घोडं अडतं. माणूस विचार करणं सोडून देतो. आणि सगळं श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो."
सरांचं विद्यांनाची पुंगी वाजवणं चालूच होतं.
"मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का सर.." ...मी माझ्या हातातील पुस्तक खाली ठेवलं.
"हो हो, विचार की.." ...बराच वेळ उभे असलेले सर स्वतःच्या खुर्चीत बसत म्हणाले.
"सर उष्णता अस्तित्वात आहे का?.." ...सरांच्या विज्ञानाचा आधार घेत मी पहिला प्रश्न केला.
"हो आहे की..." ...सरांनी काहीही विचार न करताच उत्तर दिलं.
"आणि शीतलता?" ...सरांच्या उत्तरानंतर लगेच मी पुढचा प्रश्न केला.
"हो अर्थातच ..." ...सरांनी ही तितक्याच पटकन उत्तर दिलं.
"नाही सर... असं काहीच अस्तित्वात नाही." ...माझे शब्द ऐकताच वर्गातील शांतता पुन्हा वाढली.
"सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शून्य अंशाचा ४५८ अंश खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेच उष्णतेची कमतरता... म्हणजे शीतलता."
"तूम्ही विज्ञानाचा दाखला देत ज्या पाच ज्ञानेंद्रियांचा उल्लेख केलात, त्याच प्रमाणे हे दृष्य विश्व सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांमध्ये सत्व, रज आणि तम या तीन गुणांची मिळून प्रकृती निर्माण झाली आहे आणि ती ब्रम्हस्वरूपात विसावलेली आहे."
"प्रत्येक प्राणीमात्रांचे शरीर हे ह्याच प्रकृतीने बनलेले आहे. त्याच प्रकृतीचा विस्तार केला तर अनेक तत्वे निर्माण झालेली दिसतील. हा झाला जड वास्तू जी डोळ्यानां दिसते तीचा अभ्यास, पण या अनंत ब्रम्हांडी, जो परमात्मा अनेक वर्षे साधना करूनही समजत नाही.. जो अदृष्य आहे... पण त्याच्याच सत्तेने हे विश्व चालते. ते विश्व चैतन्य.. तो ब्रम्हांडनायक.. परमात्मा.. भगवंत याच चराचरात व्यापलेला आहे. जो प्रत्येक जिवामध्ये ह्रदयात सामावलेला आहे. त्याला समजून घेणं आणि अभ्यास करणं इतकं सहज सोपं नाही सर.."
शांत झालेला वर्ग माझ्या शब्दांकडे लक्श देऊन होता. सरांनाही त्यापुढे काय बोलावं सुचत नव्हतं..
"अंधाराबद्दल काय मत आहे तुमचं. ते अस्तित्वात आहे का?" ...मी आता दुसरा प्रश्न केला.
"हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच की?" ...सरांनी आता सावध पणे उत्तर दिलं.
"तुम्ही पुन्हा चुकत आहात." ...मी सरांच्या उत्तराला तिथेच तोडत म्हणालो.
"आपलं तर्कशास्त्र थोडंसं चुकतंय."
"कसं काय..? सिद्ध करुन दाखव." ...सरांनी विश्लेषण मागितलं.
"जर आपण सृष्टीच्या द्वैत तत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात."
मला कळत नव्हतं की, इतकं मी कसं बोलू शकत होतो. त्या वेळी माझ्या प्रत्येक शब्दाचा साक्षीदार कदाचीत स्वतः विश्वचैतन्यच असेल.
"जिथे तुमचं विज्ञान विचारांबद्दल सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करते. तेच विज्ञान डोक्यात येणारे विचार कसे असतात हे देखील विश्लेशीत करु शकत नाही... हे जरा विचित्र नाही का? ...
संपूर्ण वर्ग अजूनही शांतच होता.
"विज्ञान फक्त चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करतं. त्याचा उगमस्त्रोत माहीत नसणं हे वेडेपणाचे नाही का?... मी तर म्हणेन की जिथे तुमचं विज्ञान संपतं तिथे अध्यात्माची सुरुवात होते.."
सरांनी कदाचित आता माघार घेतली होती.
"मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही... फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु."
"सर तुम्ही ही गोष्ट मानता का... की आपण माकडांचे वंशज आहोत?"
"हो नक्कीच... उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा." ...सरांना बऱ्याच वेळाने बोलायची संधी मिळाली होती.
"मला सांगा सर आपण कोणीही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली आहे का? मी तरी नाही पाहिली.. मग याचा अर्थ असा होतो का, की आपण अजूनही माकडच आहोत ..."
शांत असलेल्या वर्गात अचानक हशा पिकला.
"सर शेवटचा प्रश्न मी सर्व वर्गाला विचारतो.. तुम्ही कधी सरांची बुद्धी पाहीली आहे का... कधी स्पर्श केलंय का ? नाही ना ?"
संपूर्ण वर्ग नाही... म्हणून जोरात ओरडला.
"माफ करा सर, मग आता तुम्ही जे शिकवता ते सगळं बुद्धीहीन आहे असं अम्ही म्हटलं तर..."
"त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..." ...आता मात्र सरांच्या चेहऱ्यावर स्मित होतं.
त्यांना सुद्धा पटलं होतं...
"अगदी बरोबर बोलत आहात सर... श्रद्धा असली पाहिजे.." ...मी सरांचा तोच शब्द पकडला .... "संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा तीच श्रद्धा ठेवून रेड्यामुखी वेद वदवले होते. संत नामदेवांनी सुद्धा तीच श्रद्धा ठेवून साक्षात विठ्ठलाला जेऊ घातलं होतं.. देव आणि माणूस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा... देव आहे की नाही असा प्रश्न पडतो म्हणजे दुर्दैवच... म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरं काही नाही..."
माझ्या शेवटच्या काही शब्दांनंतर सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या त्यावेळी शिकागो मधील धर्म परिषदेत "my sisters and brothers of America" असं म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताच पहिली काही मिनिटं संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा वर्षाव केला होता त्या क्षणाची आठवण झाली..