रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

Birthday Gift 🎁🎉

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

क्रांति सूर्य !

टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.

कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!"

त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"

लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!

अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,

"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.

आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे".

बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे ये.."

सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?

तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,

"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?

"अवश्य! बोल ना.."

बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,

"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".

क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,

"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?

अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,

"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी - आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!

अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले. इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ" या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व - त्याच्या हाती दिले. म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!"

सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.

तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस"?

हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला...

"माझं नाव, विनायक दामोदर सावरकर!" 🚩

मन सुद्ध !!

प्लॅटफॉर्म नंबर १ वरून ट्रेनने दादर सोडलं. ट्रेन चालू होताच धावत धावत ५०-५५ वयाचे एक गृहस्थ लेडिज डब्यात चढले. डोळे अगदी डबडबलेले, चेहरा त्रासलेला, चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसत होता. एरवी असं कोणी लेडीज डब्बायत चढलं तर बायकांचा एकदम गदारोळ सुरु होतो. उतरो उतरो, असा त्रागाही करू लागतात. पण या भल्या माणसाकडे पाहून सगळ्याजणी एकमेकींकडे पाहायला लागल्या.

ते गृहस्थ आत येऊन एका मोकळ्या बाकड्यावर बसले. खिडकीतून बाहेर एकटक पाहत होते. डोळ्यातून येणारं पाणी लपवायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नाही.. डोळ्यांत ताराळलेलं पाणी गलांवरून ओघळून खाली उतरलं होतं.. ते बघून समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एक मुलीने त्यांना स्वतःहून विचारलं, "काय.. झालं? रडताय का तुम्ही??"

या अनोळखी जगात कोणीतरी आपली चौकशी करतंय हे बघून त्यांना हुंदका अनावर झाला.. ते म्हणाले, "केईएममध्ये हिला अॅडमिट केलंय अन् टाटामध्ये थोरला मुलगा व्हेंटिलेटरवर आहे.. आधी मुलाला कोरोनाने गाठलं, आणि त्याचा धसका घेऊन हिची सुद्धा प्रकृती बिघडली.."

त्या काकांच्या शब्दांतील ओलावा बघितला तर कित्येक दिवसांनी त्यांना कोणीतरी आपुलकीचं भेटलं आहे आणि ते आपलं मन मोकळं करत आहेत असं जाणवलं.. स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत ते सांगत होते..

"दोघींना होणारा त्रास पाहून सकाळपासून माझं मला काही सुचत नाही. एकीकडे हिच्यासाठी जीव तुटतो, तर दुसरीकडे ऑक्सिजन मास्क तोंडावर लावलेला मुलाचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नाही.. पण मी घरातला कर्ता पुरुष.. मला कुणाला सांगता येत नाही. खरं तर रडायचं होतं मोकळेपणाने.. म्हणून ठरवून लेडिज डब्यात चढलो.."

डब्ब्यात फारशी गर्दी नव्हती. प्रत्येक बाकड्यावर मोजक्याच स्त्रिया मुली बसल्या होत्या.. त्या काकांचं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून काहीजणी काकांच्या जवळ येऊन बसल्या..

काकांनी खिशातून रुमाल काढला आणि चष्माच्या आतून डोळे टिपले.. काही जणींनी बॅगेतलं चॉकलेट दिलं, काहींनी पाण्याची बाटली पुढे केली.. काका थोडे सावरले.. म्हणाले, "आपल्यात पुरुष रडत नाही, खरं तर त्याने रडायचं नसतंच. पण तुम्हा मुळींच मन आणि आम्हा पुरुषांचं मन देवाने वेगवेगळ नाही ना बनवलं.. मन असतंच की आम्हालाही.."

त्या काकांचं बोलणं ऐकून तिथेच बाजूला बसलेल्या एका महिलेने कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा बेताने स्वतःचे डोळे टिपले..

"माझ्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या त्या दोघांनीही होणारा त्रास पाहून माझं आजवर खंबीर असणारं मन जरा हेलावलंय. लेडिज डब्ब्यात चढलो म्हटल्यावर तुम्ही आरडाओरडा कराल, असा विचारही आला नाही.. उलट तुम्ही सगळ्याजणी विचारपूस करतायत.. थॅक्स.."

काकांनी डोळ्यांवरचा चष्मा काढून रुमालाने संपूर्ण चेहरा पुसला.

खरच पुरुषांना इतकं अवघड असतं का रडणं? रडून मन मोकळं करणं..?? भगवंतानि मन सगळ्यांना सारखाच दिलं असेल ना.. सगळ्यांसाठी कायम खंबीर असलेल्या त्या कर्त्या पुरुषांचही जगणं समजून घ्यायला पाहिजे की कोणीतरी.

विलेपार्ले येताच काका उतरून निघून गेले.. ते उतरताना त्यांच्या मनावरचं ओझं कमी झाल्याचं जाणवलं. आणि जाता जाता डब्यातील प्रत्येक महिलेला स्त्रियांना ते काका अप्रत्यक्षपणे सांगून गेले की, तुम्ही मुलांना वाढवताना त्यांना जरूर सांग, पुरुषानेही मोकळेपणाने रडायचं असतं. हक्काने कोणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेवून मनातलं सांगायचं असतं. मन मोकळं झालं नाही तर हृदयावर एक बॉम्ब घेऊन जगण्यासारखं आहे, ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो..


.. अपूर्ण

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

दुसरा अंक 🎭

 

DISCLAIMER

या कथेतील पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असून, काही घटना काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

चाफ्याचा इंद्रधनुष्य !!

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही मोजक्या गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...

 

गुरुवार, १ जुलै, २०२१

मोगरा फुलला

 अनघा आपल्या बंगल्याच्या आवारात झाडांना पाणी घालत होती..

"काय ग.. तू आज परत आलीस.."

"ताय वंजळभरच पायजेती फुलं देवासाठी, द्या की व. तुमच्या झाडाला हायती बी फुलं.. म्हणून मागत्या मी. इथं कुठच येवढी फूलं नायत फकस्त तुमच्याच बंगल्यात हायती."

ती बारा चौदा वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाकडे तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुलं मागत होती.

"नाही म्हणून सांगितलं ना. निघ इथून!" ... असं म्हणून अनघा घरात परत गेली.

"कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?" असं एकटीच बडबडत होती..

तेवढ्यात तिचा नवरा राघव आला.. "काय झालं? कोणाला बडबडतेस? इथे कोणीच दिसतच नाहीय?"

"अहो.. गेले चार दिवस झाले एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येतेय. देवाला पाहिजेत म्हणे.. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत." ... अनघा थोड्या चिडक्या स्वरात बडबडत होती..

"अग ती फुलंच तर मागतेय, द्यायचीस ना. तसंही मोगरा किती लगडलाय फुलांनी." बाहेर झाडाकडे बघत राघव म्हणाला..

"हो फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत.. अख्ख्या कॉलनीत कोणाच्याच अंगणात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त आपल्याच झाडाला आहेत." अनघाच्या स्वरात थोडा अभिमान अहंकार दिसत होता.. "आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत फुलं. खत-पाणी, वेळेत कटिंग, सगळं वेळेत करावं लागतं.. तुम्हाला माहिती आहे ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. सगळ्या देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत."

"अग, एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेस असतं.. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच चरणांशी ना.." राघव अनघाला समाजविण्याच्या प्रयत्नात होता.. "तू वाहिली काय, अन् त्या छोट्या मुलीने वाहिली काय.. देव तर एकच आहे ना.."

"ओ.. तुमचं लॉजिक तुमच्या जवळच ठेवा. माझे कष्ट आहेत त्यामागे." .. अनघा पुन्हा चिडक्या स्वरात म्हणाली..

"एक सांगू.." राघव अनघाला पुन्हा समजावू लागला.. "असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कोणाला.. आणि काय फुलं तर मागतेय ना.. तिने कूठे तुला जेवण किंवा पैसे मागितले.. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं.."

"बरं.. उद्या आली मागायला तर देईन चार फुलं.. तेही ही तुम्ही सांगता म्हणून.." अनघाला राघवच म्हणणं थोडं पटलं होतं..

"बरं पण जरा प्रेमाने दे.. रागे नको भरू. त्या छोट्या मुलीला.." अनघाचं बोलणं ऐकून राघवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं..

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारात ती मुलगी उभी.. अनघाला तर राग आलेला पण राघवसाठी तिने स्वतःला सावरलं..

"ए मुली.. थांब तिथंच देते फुलं." छोट्या पिशवीत अनघाने पंधरा वीस फुलं तोडून टाकली.. आणि तिच्याजवळ जात म्हणाली.. "उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला.."

"ताय ते आठ दिस फुलं पायजेती.. देशीला का?" .. फुलांची पिशवी उराशी धरून ती म्हणाली..

"आठ दिवस.. रोज... कशाला?"

"ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा तिथं द्याला.. माय ला पायजे व्हती." तिची नजर खाली अनघाच्या पायावर होती.. चेहऱ्यावर निर्विकार भाव.. आवाज खूप लाघवी.. आणि ती बोलत होती.. "माय देवाला बोलली हाय आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन."

"देवाला अर्पण करायला मागून फुलं वाहतात का.." अनघाचं स्वर थोडा उंचावला होता.. ती चढ्या आवाजातच त्या पोरीशी बोलत होती.. "घे जा ना विकत देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत."

मुलीचा चेहरा खाडकन उतरला. "ताय.. ते.. पैसं रोज... एवढं.." मुलीला पुढे काय बोलावं सुचेना..

"कळलं.. नाहीत ना पैसे. मग बोलताच कशाला गं असं देवाला.." .. अनघाचा स्वर तसाच होता..

ती काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.

अनघाला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. "उद्या येईल का ती परत? नाही येणार बहुतेक.. किती बोलले मी.. ते ही फुलांसाठी." अनघा स्वतःशीच विचार करत म्हणाली..

आज ताजी असणारी फूलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं झाडाकडे एक नजर टाकली.. मोगरा ही थोडा नाराजच दिसला. "जावू दे.. उद्या च उद्या पाहू." असं म्हणत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच.. अनघाला थोडं हायसं वाटलं.. आली बाई आज परत..

"ताय..." तिने हाक मारली..

"हो आले.. देते फुलं.." अनघा हातातलं काम बाजूला ठेवून बाहेर आली.. "कुठं राहतेस गं.."

"गावाच्या बाहेर पडकी साळा हाय तिथ." कुठल्यातरी एका दिशेला बोट दाखवत त्या मुलीने आपला पत्ता सांगितला..

"घरात कोण कोण आहे" फुलं तोडून तिच्या पिशवीत टाकताना अनघाने प्रश्न विचारला..

"माय, बा, मोठी भन, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.." असं म्हणून त्या पोरीने बोट अगदी आकाशाकडे दाखवलं..

"बरं बरं. घे फुलं आणि जा.."

"जी ताय.."
फुलं मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेउन ती निघून गेली..

आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती.. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे.. अनघाच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली... स्वतःशी हसत विचार करत होती..

"मी रोज फुकट फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झाला. नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं.. देव ही नकळत आपल्यावर खूष असणारच." अनघा एकटीच बोलत होती.

इतक्यात राघव तिथे आला..
"काय.. एकट्याच गालात हसताय." राघव ने विचारलं..

"काही नाही हो.. ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येत होती पण आता ह्या काही दिवसात कुठे आलीच नाही." बाहेरच्या मोगऱ्याच्या झाडाकडे बघत अनघा म्हणाली..

"अगं.. आता कशाला येईल..? तिला आठच दिवस फुलं हवी होती ना!" राघव म्हणाला.. "तसंही तुला तीचं फुलं मागणं आवडतं नव्हतच की.."

"आहो.. पण एकदा परत येवून आभार तरी तिने मानायचे ना.." डोळ्यात अहंकाराची लकेर ठेऊन अनघा बोलत होती.. "लोकं केलेले उपकार असे विसरतात म्हणून कोणाला काही देवू नये. तुम्ही सांगितलेलं ना म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस. रोज..."

अनघाचं बोलणं ऐकून राघवला हसू आलं..

"काय झालं...?" अनघाने विचारलं..

"काही नाही."

तेवढ्यात बाहेरून हाक आली.. "ताय.. व ताय!"

हा तर त्या मुलीचा आवाज. दोघंही बाहेर आले तर दारात ती मुलगी उभी होती..

"काय आज पण फुलं पाहिजेत का" प्रश्नार्थक नजरेनं अनघाने विचारलं.. "आधीच सांगते.. नाही देणार आज फुलं.. थोडी कमीच लागली आहेत.. मला देवपूजेला पाहिजेत."

"फुलं नको ताय... ते.... हे... हे.." हातातलं मळकट फडकं अनघापुढे करत ती म्हणाली..

अनघाने त्या फडक्याकडे बघितलं.. "काय.. .ते... हे...."

"ताय.. ते माझी मोठी भन बाळतपणाला आल्या.. यवस्थित बाळ हु दे म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला." त्या मुलीच्या नजरेतील ओलावा अनघाला दिसत होता.

"तुम्ही फुलं दिली आयचा नवस पुरा झाला.. परवा दिशी मुलगा झाला भणीला.. यवस्थित हाय सगळ.." असं सांगताना मुलीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.. "माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो ताय.. बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी.." हातातलं फडकं अनघाकडे देत ती म्हणाली.. "बा म्हणाला, तुमचं उपकार जन्मभर नाय इसरणार.. अन् माय म्हणली कुणाचबी काय फुकट घेव न्हाय. आपल्या परीनं परत करावं.. म्हणून हे.. घ्या..."

अनघाने ते मळकट फडकं हातात घेतलं.. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मुर्ती होती.. किती तेजस्वी आनंदी, सात्विक आहे ही मुर्ती. अनघा आनंदून गेली..

"अगं ऐक..." हातातील मूर्तीवरची नजर उचलून समोर बघत अनघा म्हणाली..

पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मुर्ती देवून निघूनही गेली. अनघाचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली. अनघाचे डोळे पाण्याने डबडबले..

आपण किती खुजे, संकुचित.. एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे.. सारा गर्व अभिमान एका झटक्यात गळून पडला.. एखाद्याची पात्रता ठरवणारे आपण कोण..? का हिने न बोलता आपल्याला आपली पात्रता दाखवली.. अनघाला तिची चूक उमगली होती..

आता मोगऱ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला.. आज तो रोजच्या पेक्षा जास्त टवटवीत बहरलेला वाटला .. 🙏🏻🌹

🌸🌺🌼🌻🌹🍃🌷🍀☘️🍁🍂
📚📖🖋️🙏🏻🌹



अपूर्ण...

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

बालगंधर्वांची अखेर!

१४/१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना!

त्या दिवशी नेमका मी पुण्यात होतो. दुपारची जेवण वेळ. मी नारायण गेटजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो, तो त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकजण पुढे विस्तव धरलेला आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली. ती जवळजवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची. पुण्याच्या नाट्यक्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्यक्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे त्या प्रेतयात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले.

‘कोण?’

न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले.. ‘अहो… गंधर्व… बालगंधर्व…’

बालगंधर्वाची प्रेतयात्रा अणि ती अवघ्या इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत!

बालगंधर्व…सौभद्र…स्वयंवर…मृच्छकटिक…एकच प्याला…जोहार मायबाप जोहार…अन्नदाते मायबाप हो..

हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली.

ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरापान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं! चला आता.’

घरी आलो. चार वाजून गेले होते…बालगंधर्वांची प्रेतयात्रा अशा घाईगडबडीने व पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत गाजावाजा न करता गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली?

त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे!

गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतिस्थानात नारायणराव राजीखुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नटमंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा-पिसे गळालेला राजहंस!

कुणीही केली नसती अशी सेवा या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली. त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता! कारण एकच… त्याच्या गळ्यावरील तिचे भक्तियुक्त प्रेम. जे प्रेम राधेने कृष्णावर केले… अहिल्येने रामावर केले… ते प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले. त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्यापांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी अगोदर

अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच

विदीर्ण झालेला राजहंस. त्यावेळी त्याच्या रसिकजनांनी व भगतगणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते.

असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व…

मुसलमान झालेला. आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना

अव्हेरून त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते, धर्मांतरही झाले! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत गावोगावच्या जुन्या भगतगणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले.

एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. सोलापूरचा. याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली.

पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. मेकॉनकी थिएटर म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेर! तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो असे वाटते असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले.

नाटके लावता येत नव्हती. पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्याभाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वाला थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पायपिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला…!

गंधर्वाचे भाषण सुरू झाले. ‘अन्नदाते! मायबाप हो! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच मला जगवा… तुमच्या उष्ट्याचा मी महार.’

असे अनेक थैली समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत. चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे उभी आडवी तिरपी कशीही बेरीज केली तरी उत्तर येईल शून्य! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला.

परंतु बिचारीचे नशीब खोटे! ती तरी त्याला काय करणार? बालगंधर्वाभोवती त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोतपक्षी त्याच्याजवळून उडून गेले व साऱ्या महाराष्ट्रात गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश केला अशी हाकाटी करीत राहिले.

वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कलाजीवनाचा मृच्छकटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे.

ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्रीभूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गाननृत्यही करून एक आगळा साक्षात्कार घडविला होता तो काळ दृष्टीसमोर आणा म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुतिमाधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून!

हिराबाईंच्या गानमाधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत. मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनयकुशल आणि नृत्यगानकुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय!

जातिधर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य

समीक्षकांनी आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते. नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले.

दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून त्याचे कोडकौतुक करणार्‍या मानवजातीप्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठी आहेत असा भ्रामक समज त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोहभस्म आणि सुवर्णभस्म जे दडलेले असते त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात.

सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानवजातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली!

तिचे व बालगंधर्वांचे मीलन हिंदू रसिकांना न रुचल्याने त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदानालस्ती झाली त्यामुळे ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे. ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंचपक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्वभक्ताच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे! ती काळी साळी आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे. गोहरला चेटकीण म्हणणारे हे महाभाग कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील व नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे? कारण बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती जर विजापूरची कलावंतीणच होती!

ते काहीही असो. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीरसंबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता तर तो गायनाची पताका

दिगंत घेऊन जाणारा झाला असता! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला?

या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. गंधर्व अत्यवस्थ… अशी सिंगल बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ती वाचून मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना!

आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की आजही अंगावर शहारे येतात.

आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार याशिवाय दुसरे काही नाही केले त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक नव्हता! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता.

होते ते एका हौशी नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर!

कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची असा विधिलिखित संकेतच असतो की काय कुणास ठाऊक! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस ‘प्यासा’ रहावे लागते.

एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली. गंधर्वांचे भाग्य थोर! त्याच्यावर पुस्तके लिहिली जात आहेत.

पण अप्सरेचा मानवी अवतार तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला…


लेखक - वसंत शा. वैद्य